कोल्हापूर:
विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा बराच तापला आहे. या अतिक्रमणांच्या विरोधात संभाजी राजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी रविवारी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी जमा झालेला जमाव आक्रमक झाला होता आणि या जमावाने तोडफोड केली होती. या जमावाला आवरणं पोलिसांनाही अवघड झालं होतं. या अतिक्रमणाच्या मुद्दावरून बोलताना संभाजी राजे छत्रपती यांनी आपण विशाळगडावर गेलो तेव्हा घाबरलो होतो असे म्हटले आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरकारनेही गडावर अतिक्रमण केले
“मी ज्या परिस्थितीत तिथे गेलो तेव्हा घाबरून गेलो होतो. विशाळगडावर अशी परिस्थिती कशी असू शकतो असा विचार माझ्या मनात आला. तिथे बकरे कापले होते, तिथेच रक्त सांडलेलं होतं. कोंबड्या कापलेल्या होत्या. सगळीकडे दुर्गंधी होती, दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. पुरातत्व खात्याची ही जागा असताना ग्रामपंचायतीसाठी सरकारने जागा दिली. घरांसाठी तहसीलदाराने परवानगी दिली.”
विनय कोरेंवर टीका
संभाजी राजे यांनी म्हटले की, विशाळगडावर पार्ट्या चालायच्या. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्षणकर्ता बनलेला हा गड पार्ट्यांचा अड्डा बनला होता. कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ तिथे सात दिवस राहिला होता. आताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री जे पूर्वी गृहमंत्री होते तेव्हा त्यांना लक्षात आलं नाही ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही धर्माच्या लोकांनी मान्य केलं होतं की गडावर 158 अतिक्रमणे आहे. आणि पायथ्याला 12 अतिक्रमणे आहेत. ही काढण्यासाठी सुरूवात झाली होती तेव्हा विनय कोरे यात घुसले आणि याला कथित स्थगिती मिळाली असे दाखवलं. जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता तर कुठेही स्थगिती असल्याचे दिसले नाही.
अमेरिकेमध्येही प्रश्न विचारून भंडावले
संभाजीराजे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगभरात नेणाऱ्या अनेकांमध्ये मी आहे. तिथे जे घडलं त्याला मी जबाबदार असेल तर मला अटक करा. मी अमेरिकेमधील लॉस एंजलिसला गेलो होतो. शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने मला बोलावलं होतं. 10 दिवस मी आनंदाने राहू शकलो नाही.कारण लोकं मला प्रश्न विचारायला लागले की विशाळगडाबाबत तुम्ही आता बोलत का नाही. विशाळगडावर भयानक परिस्थिती आहे, गलिच्छ प्रकारे अतिक्रमण करण्यात आले आहे असे संभाजी राजे यांचे म्हणमे आहे. विशाळगडावर एका धर्माचे नाही तर दोन्ही धर्माचे अतिक्रमण झाले आहे, हे मला प्रामुख्याने नमूद करायचे आहे असे ते म्हणाले. ज्या विशालगडाने शिवाजी महाराजांचे रक्षण केले , त्या विशाळगडासाठी मी जर आक्रमक भूमिका घेतली नाही तर मला या घराण्यात राहण्याचा अधिकार काय? असा सवाल त्यांनी केला आहे.