देशा
मुंबई:
Trainee IAS officer Puja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा प्रशिक्षाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे. या प्रकराच्या कारवाईची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीओपीटीनं हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारनं 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस पदावर रुजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर यांनी UPSCच्या 2022 च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळवला. या रँकवर आयएएस पद मिळणे अवघड असतानाही पुजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रीमिलेअर असल्याचे प्रमाणपत्र देऊन दृष्टिदोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगतीले होते. त्यावर आयएएस पदावर वर्णी लावली आहे. पण, पूजा यांच्या वडिलांनी वंचित बहुजन पक्षाकडून नुकतीच लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगरमधून लढवली आहे.
खेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पूजा यांनी सादर केलेल्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
प्रशिक्षण कालावधीमध्ये गैरवर्तन
प्रशिक्षण घेतलेल्या विभागांमध्येही त्यांनी गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत. खेडकर या ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. 3 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली.
प्रशिक्षणार्थी असतानाच स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी माजी अधिकारी असलेल्या वडिलांचा वशिला, स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, आलिशान खासगी गाडीवरच लाल दिवा लावणे असे अनेक आरोप पूजा यांच्यावर आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपल्या 26 पानी अहवालात पूजाचे किस्से सांगितले होते.
पूजा खेडकर यांचे हे कारनामे उघड झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं याची गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारनंही याबाबत खास चौकशी समिती नेमली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.