छत्रपती संभाजीनगर:
विशाळगडमधील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलाय. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे यांनी रविवारी अतिक्रमणाच्या विरोधात कार्यकर्त्यांसह गडावर आंदोलन केलं. या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर एआयए पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व मुस्लीम समाजानं याबाबत आंदोलन करावं, असं आवाहन पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केलंय. जलील यांनी यावेळी स्वत: कोल्हापूरला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मी महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. कोल्हापूरमधील व्हिडिओनंतर तिथं कशा पद्धतीनं तोडफोड झाली, हे पाहायला मिळतंय. लोकांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुस्लीम समाजासोबत जे सेक्युलर आहेत, त्यांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावं असं जलील यांनी म्हंटलंय.
विशाल गडावरील सर्व प्रकार हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे. या प्रकरणात गोरगरिबांना बळीचा बकरा केला जात आहे. पोटावर जगणाऱ्या लोकांकाच्या घरात घुसून तुम्ही मारहाण करत आहात. घरं पाहून मारहाण झाली. वाहनं जाळण्यात आले. हे सर्व राजकीय षडयंत्र आहे. पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याांसारखे वागत होते, असा आरोप जलील यांनी सांगितला.
रविवारी काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते. अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर काहींनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.दुपारी बाराच्या सुमारास जमावाने आक्रमक भूमिका घेतली. गजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झालं.
या परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली. काही वाहनांवर दगड घालण्यात आले होते. दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. काही घरांमधल्या वस्तू बाहेर फेकण्यात आल्या. या परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते. संतप्त जमावासमोर प्रत्येकजण हतबल झाला होता.