छत्रपती संभाजीनगर:
आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचं विशाखापट्टणममधील राजेशाही बंगल्याचे (रुशिकोंडा हिल पॅलेस) दरवाजे रविवारी सामान्य जनतेसाठी उघडण्यात आले. जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या कार्यकाळात एकूण 452 कोटी रुपये खर्च करुन 7 लग्झरी बंगले आणि ऑफिसच्या इमारती बांधल्या होत्या. हे सर्व बांधकाम पर्यावरणाचे सर्व नियम पायदळी तुडवून झालंय असा आरोप चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांनी केला आहे.
तेलुगु देसम पक्षाचे नेते श्रीनिवास राव यांच्या नेतृत्त्वाखालील NDA च्या शिष्टमंडळानं आणि मीडियानं रविवारी या राजेशाही बंगल्याचा दौरा केला. या इमारतीमधील सौंदर्य आणि लग्झरी गोष्टी पाहून सर्व थक्क झाले.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
9.88 एकरमध्ये पॅलेस
रुशिकोंडा पॅलेस समुद्राच्या समोर 9.88 एकर जागेत बांधण्यात आलं आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात इथं 7 लग्झरी बिल्डिंग बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 इमारती प्रामुख्यानं राहण्यासाठी आहेत. प्रत्येक बेडरुममध्ये अटॅच लग्झरी रुम आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या लग्झरी सुविधा आहेत. उच्च दर्जाचं फर्निचर, सजावट, लखलखते झुंबर, बाथटब आणि फ्लोर वर्कसाठी सामान्य करदात्यांच्या पैशांचा वापर करण्यात आला आहे.
फ्लॅटच्या आकारेचे बाथरुम
या फ्लॅटमधील एक बाथरुम फ्लॅटच्या आकाराचे म्हणजे 430 चौरस फूट आहे. बाथटबसाठी मोठा खर्च करण्यात आलाय. इमारतीमधील इंटिरीयर डेकोरेशसाठी साहित्य आणि फर्निचरसाठी 33 कोटी खर्चण्यात आले आहेत. तर रस्ते,. नाले आणि बागांसाठी 50 कोटी खर्च करण्यात आले आहेत. इमारतीच्या बाहेरील पार्कमध्ये दोन तीन पद्धतीनं वॉकवे बनवण्यात आले आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्याच्या तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असा आरोप तेलुगु देसम पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनी केलाय.
निवडणुकीपूर्वी उद्घाटन
जगन मोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही परवानगीशिवाय या इमारतींचं उद्धघाटन केलं होतं. त्यांनी निवडणुकीनंतर या इमारतीमध्ये एन्ट्री करण्याची योजना केली होती. पण, विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आंध्र प्रदेशचं संपूर्ण राजकारण बदलून गेलं आहे. TDP नेते नारा लोकेश यांनी या भव्य पॅलेसची तुलना इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेन यांनी उभारलेल्या महालाशी केली आहे. हे पॅलेस उभारताना गोपनियता पाळण्यात आली. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पक्षाच्या समर्थकांनाच याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. हे पॅलेस बनवण्यासाठी रुशिकोंडा हिल्समध्ये बनवण्यात आलेले ग्रीन रिसोर्ट्स जमीनदोस्त करण्यात आले. त्या रिसॉर्टपासून दरवर्षी 8 कोटीपर्यंतचं उत्पन्न होत होतं. रेड्डी सरकारनं या प्रकरणात न्यायालयाचीही दिशाभूल केली, असा आरोप लोकेश यांनी केला आहे, या भागातील फक्त जमीन समतल करण्यासाठी 95 कोटी खर्च करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.