मुंबई:
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात नुकत्याच झालेल्या T20 सीरिजमध्ये शुबमन गिल (Shubman Gill) टीम इंडियाचा कॅप्टन होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा या सीनिअर खेळाडूंनी T20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतलीय. हे दोघंही सीनियर खेळाडू कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहित-विराटनंतर शुबमन गिलला टीम इंडियाचं भविष्य मानलं जातंय. झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला कॅप्टनसी देऊन निवड समितीनं त्याचे संकेत दिले आहेत. शुबमन गिलच्या कॅप्टनसीवर टीम इंडियाचा स्पिनर अमित मिश्रानं (Amit Mishra) थेट टीका केली आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित मिश्रानं एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय क्रिकेटमधील अनेक विषयांवर बेधडक मतं व्यक्त केली आहेत. त्याला गिल भारताचा भविष्यातील कॅप्टन आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मिश्रानं सरळ सांगितलं की, ‘गिलला कॅप्टनसीबाबत काहीही आयडिया नाही. मी त्याला आयपीएलमध्ये कॅप्टनसी करताना पाहिलंय. कॅप्टनसी कसं करावं हे त्याला माहिती नाही.’
मिश्रा पुढं म्हणाला, ‘त्यावेळी हार्दिक टीममधून गेला होता. गुजरातकडं राशिद खान सोडून अन्य कोणताही खेळाडू कॅप्टन करावा असा नव्हता. गुजरातच्या मॅनेजमेंटनं त्याला नाईलाजानं कॅप्टन केलं असं मला वाटतं. मी त्याला कॅप्टनसी करताना पाहिलंय. तो मला कॅप्टन म्हणून योग्य वाटत नाही. तो भारताचा कॅप्टन होऊ शकतो, असं मी मानत नाही,’ असं मिश्रानं सांगितलं.
आयपीएल 2024 मध्ये गिलच्या कॅप्टनसीमध्ये खेळणारी गुजरात टायटन्सची टीम आठव्या क्रमांकावर होती. नुकत्याच झालेल्या झिमब्बावे सीरिजमध्ये भारतानं 4-1 असा विजय मिळवला. त्याचवेळी अमित मिश्रानं गिलच्या कॅप्टनसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवलीय. अमित मिश्राचं हे वक्तव्य क्रिकेट फॅन्समध्ये चांगलंच व्हायरल झालंय.
टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन म्हणून संजू सॅमनस, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड हे पर्याय आहेत, असं मिश्रानं सांगितलं. भारत-झिम्बाब्वे सीरिजमधील टीम इंडियाचा गायकवाड पहिल्या मॅचपासून सदस्य होता. तर संजू सॅमसन दुसऱ्या मॅचपासून टीममध्ये जॉईन झाला.
गिल द्रविडचा आवडता?
राहुल द्रविडचा आवडता असल्यानं गिलला टीम इंडियाचा कॅप्टन करण्यात आलं का? हा प्रश्न मिश्राला विचारला. त्यावर प्रत्येकाचं कुणीतरही आवडतं असतं, असं उत्तर मिश्रानं दिलं. ‘ मी शुबमन गिलचा द्वेष्टा नाही. तो मलाही आवडतो. पण, माझ्या मते ऋतुराज हा चांगला पर्याय आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्ज आणि एशियन गेम्समध्ये अवघड परिस्थिीत रन केले आहेत. त्याची T20 वर्ल्ड कपमध्ये यशस्वी जयस्वालसारखी निवड करायला हवी होती.
‘तो (ऋतुराज) T20, वन-डे आणि टेस्ट या सर्व प्रकारात चांगला खेळू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो टीममध्ये स्थिरता आणू शकतो. तो धोकादायक फटके फारसे मारत नाही. त्यानं चांगला सोशल मीडिया, जनसंपर्क मॅनेजर घेण्याची गरज आहे,’ असं मिश्रानं सांगितलं.