मुंबई:
विधानसभेत आज बुधवारी मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला. भाजप आमदार अमित साटम यांनी विरोधकांना मराठा आरक्षणाचे काही पडले नाही. त्यांना त्यांचे राजकारण करायचे आहे असा आरोप करत विधानसभेचे वातावरण तापवले. साटम बोलत असताना सत्ताधारी वेलमध्ये जमा झाले. विरोधकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जवळपास या गोंधळामुळे तीन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब करण्यात आली. यामुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, राम कदम यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विरोधकांची भूमीका काय?
भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत मराठा आरक्षणासाठी आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीला विरोधक का आले नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. विरोधकांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे काही पडले नाही असा आरोप साटम यांनी केला. शिवाय ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे की नाही याबाबत विरोधकांची भूमीका काय असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला पण गदारोळ वाढला आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
विजय वडेट्टीवारांचा पलटवार
विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आरोपाच्या फैरी झडत होत्या. त्यावेळी विरोधकांकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा सांभाळला. सत्ताधारी स्वत:चे पाप लपवण्यासाठी हा गोंधळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार पलटवार केला. राज्यात जो मराठा विरूद्ध ओबीसी हा वाद पेटवला जात आहे त्या पापात सर्वात मोठा वाटा महायुतीचाच असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी एकच खळबळ उडवून दिली. मराठा विरुद्ध ओबीसी वाद महायुतीने निर्माण केला. पाणी नाकात घुसायला लागल्यावर यांना आता बैठकीची आठवण सत्ताधाऱ्यांना झाली असा आरोपही त्यांनी केला.त्यानंतर सभागृहात गोंधळ आणखीन वाढला. अध्यक्षांनी सर्वांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र गोंधळ काही कमी झाला नाही. शेवटी सभागृहाचे कामकाज अध्यक्षांना दुसऱ्यांदा तहकूब करावे लागले.
विखेंची शरद पवारांवर टिका
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केले. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होवूनही त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही असा आरोप विखेंनी केला. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे मराठा समाजाने आणि जरांगेंनी ओळखावे. त्यांना आता गाव बंदी करावी असेही विखे यावेळी म्हणाले. लोकसभेत मिळालेल्या फसव्या यशामुळे विरोधक आंधळे झाले आहेत. लोकांना झुलवत ठेवणे हे विरोधकांचे काम आहे. पण आता ते शक्य नाही असे म्हणत त्यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला.
बैठकीला जाण्यापासून रोखणारं कोण?
यावेळी आशिष शेलार यांनीही महाविकास आघाडीचे नेते पहिल्यांदा सर्व पक्षीय बैठकीला येणार होते. पण ते या बैठकीला आले नाहीत. अचानक हा निर्णय का झाला? बैठकीला जाण्यापासून रोखणारे कोण होते? ऐन वेळी कोणाचा निरोप आला? या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी द्यावी असे शेलार म्हणाले. शेलारां पाठोपाठ राम कदम, संजय कुटे, नितेश राणे, यांनी विरोधकांची कोंडी केली. त्यामुळे विधानसभेत गदारोळ झाला. शेवटी गदारोळात कामकाज सुरूच ठेवले. मात्र त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.