महाराष्ट्र भूमी: आज (18 फेब्रुवारी)कलानगर येथे ओपन जीपवरून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी ठाकरे समर्थक मोठ्या संख्येने दिसून आले.’उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे’ ,अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे समर्थकांनी आज मातोश्रीबाहेर घेराव केला होता. या शिवसैनिकांना संबोधित करत आज उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, निवडणूक आयोग ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.
“शिवसेना हे नाव चोरले गेले, धनुष्यबाण चोरले. ज्यांनी हे चोरले त्यांना माहिती नाही की त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर डंख मारलाय. भाजपला असे वाटत असेल की, त्यांच्या हाताशी असणाऱ्या यंत्रणा जया गुलाम बनल्या आहेत, त्या आमच्यावर सोडल्या तर शिवसेना संपेल. मात्र, शिवसेना संपणार नाही. आज मी याच गुलामांना आव्हान देतो.शिवसेना कुणाची? हे महाराष्ट्राच्या मालकाला ठरवण्याची वेळ आली आहे.हे जनतेला ठरवू द्यात. यांना ठाकरे नाव पाहिजे बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नकोय.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- “राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं…”,निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मित्र पक्षाची प्रतिक्रिया काय?
पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “एक काळ होता जेव्हा लोक मोदींचा मुखवटा घालायचे.आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून यावे लागते आहे. हाच आमचा मोठा विजय आहे. महाराष्ट्राची जनता मूर्ख नाहीये. ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले गेले, पवित्र धनुष्यबाण चोराला दिले गेले. कदाचित आपली मशाल निशाणीही काढली जाईल. ज्याने धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील तर त्यांनी निवडणुकीत यावे. मी मशाल घेऊन येतो. कारण, धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो.”,असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. “मी खचलो नाही, खचणार नाही.तुमच्या पाठीच्या जोरावर मी उभा आहे. असे कितीही चोर आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.”, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.