अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली.
मुंबई: विधानसभेचे पावसाळी अधिवेश आज गुरूवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 8 आमदारांचे राजीनामे मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हे आमदार कोण याची माहितीही त्यांनी विधानसभेला दिली. यात 4 आमदार हे काँग्रेसचे आहेत. तर दोन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार आहे. तर राजू पारवे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राजीनामा दिला होता.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदार झाल्यानंतर दिले राजीनामे
आमदार असलेले सात जण लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर लोकसभा लढवण्यासाठी राजू पारवे यांनी आधीच राजीनामा दिला होता. पण त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बळवंत वानखडे आणि प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून तर प्रणिती शिंदे सोलापूर, बळवंत वानखडे अमरावती आणि प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांचाही राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ते अहमदनगर लोकसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. त्यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी : सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भूमरे हे सरकारमध्ये मंत्री आहेत. पण त्यांनी छ. संभाजीनगर लोकसभेतून विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. त्यामुळे त्यांनीही आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. तर रविंद्र वायकर यांनीही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निसटता विजय मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल किर्तिकर यांचा पराभव केला. तर राजू पारवे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी रामटेक लोकसभेतून निवडणूक लढवली पण त्यांचा त्यात पराभव झाला. त्या आधीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.